शालेय पोषण आहार खर्च मर्यादेत 7.5 टक्के दरवाढ
केंद व राज्य शासनाच्या सहकार्याने प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जात आहे. केंद्र शासनाने 2014-15 या आर्थीक वर्षापासून खर्च मर्यादीत दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार राज्य शासनानेही 7.5 टक्के दरवाढ केली आहे. त्यामध्ये सुधारित दरानुसार प्राथमिक शाळेतील प्रति लाभार्थीला 3 रू. 59 पैसे व उच्च प्राथमिकच्या प्रति लाभार्थीला 5 रू. 38 पैसे मिळणार आहेत. सुधारित दर 1 जुलै 2014 पासून लागू करण्यात येणार आहेत.
राज्यामध्ये शालेय पोषण आहार ही योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिली ते पाचवीच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथीनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम व उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजविण्याच्या दरासाठी प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गासाठी 3 रू. 34 पैसे व सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गासाठी 5 रू. प्रमाणे निश्चित करण्यात आली होती. केंद्रशासनाने सन 2014-15 या आर्थीक वर्षापासून या खर्च मर्यादेत 7.5 टक्के दरवाढ मंजूर केली. यानुसार राज्य शासनानेही विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार दरवाढ करण्यास मान्यता दिली आहे.
प्राथमिकसाठी आहाराचे प्रमाण 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिने यासाठी प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा 3 रू. 59 पैसे व प्रतिदिन लाभार्थी आहाराचा दर 3 रू. 5 पैसे असा करण्यात आला आहे. तर उच्च प्राथमिकसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम आहारासाठी प्रतिदिन लाभार्थी आहारखर्च मर्यादा 5 रू. 38 पैसे व प्रतिदिन लाभार्थी आहार दर 5 रू. 20 पैसे करण्यात आला आहे. लाभार्थी खर्च मर्यादेमधून प्राथमिक गटासाठी 9 पैसे व उच्च प्राथमिक गटातून 18 पैसे प्रतिदिन प्रति लाभार्थी योजनेसाठी लागणारे विविध साहित्य, साधनसामृग्री व सुक्ष्म पोषण यासाठी असणार आहे. तांदळाबरोबर इतर धान्यादी माल शाळेत पुरवठा करण्यात येतो. त्याच्यापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिकमध्ये आहार खर्च 3 रू. 50 पैसे असून 2 रू. 19 पैसे धान्यादी माल पुरविण्यासाठी 1 रू. 31 पैसे इंधन व भाजीपाला यासाठी खर्च करावा लागणार आहे. उच्च प्राथमिकमध्ये 5 रू. 20 पैसे आहारखर्च अनुज्ञेय असून धान्यादी माल पुरविण्यासाठी 3 रू. 56 पैसे, इंधन व भाजीपाला यासाठी 1 रू. 64 पैसे खर्च करावा लागणार आहे.
शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, बचत गट यांच्यामार्फत शिजविलेल्या तयार आहाराचा पुरवठा शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करून तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱया यंत्रणेस प्राथमिकसाठी 3 रू. 50 पैसे व उच्च प्राथमिकसाठी 5 रू. 20 पैसे प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.